प्रशांत बांबोडे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी...
विजय जाधव, प्रतिनिधी...
मुल तालुक्यातील नांदगाव परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळामुळे नांदगाव येथील अनेक घरांची व दुकानांची पत्रे उडाली असून नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्याभरापासून नांदगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून वादळी वाऱ्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो आहे.
नांदगावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांबोडे यांनी या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली असून विद्युत वितरण कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
"परिसरातील अनेक गावांमध्ये वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या आडव्या येत असून वाऱ्यामुळे त्या फांद्या जिवंत तारांवर पडतात. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तात्काळ उपाययोजना करून अशा झाडांची छाटणी करावी व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा," अशी मागणी त्यांनी केली.
तप्त उन्हाळ्यात नागरिकांना एकीकडे गारपीटीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजपा नेते प्रशांत बांबोडे यांनी जोरदारपणे मांडली आहे.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading