मुल तालुक्यात गोहत्या बंदी कायदा लागू आहे का? – माजी उपसरपंच विजय जाधव यांचा संतप्त सवाल
✍️ मुल (चंद्रपूर) : मुल तालुक्यात सतत घडणाऱ्या बैल चोरी आणि गोहत्या प्रकरणांमुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगावचे माजी उपसरपंच विजय जाधव यांनी “मुल तालुक्यात गोहत्या बंदी कायदा लागू आहे की नाही?” असा थेट सवाल प्रशासन आणि पोलीस विभागाला विचारला आहे.
जाधव यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील विविध भागांतून बैल चोरी आणि गोहत्या यांच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक ठिकाणी चोरी केलेल्या बैलांचे मांस विक्रीसाठी तयार करताना पोलिसांनी पुरावेही जप्त केले आहेत. तरीदेखील, या गंभीर प्रकरणांवर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, हे अधिक चिंताजनक आहे.
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, काहींनी तर बेंबाळ पोलीस चौकीला यासंदर्भात लेखी तक्रारीही दिल्या आहेत. मात्र, तक्रार नोंदवूनही तपास पुढे सरकलेला नाही, असे आरोप जाधव यांनी केले. त्यांनी सांगितले की, “बैल चोरी करून त्यांची गोहत्या करून मांस विक्रीचा उघड धंदा सुरू आहे, आणि तरीसुद्धा पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. अशा निष्क्रिय कारभारामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढला असून ते आता बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत.”
विजय जाधव आणि शेतकरी बांधवांनी या सर्व प्रकरणाबाबत क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री लोकप्रिय नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, संबंधित घटनांची तात्काळ सखोल चौकशी करून सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि कठोर शासन केले जावे.
जाधव पुढे म्हणाले, “मागील वर्षीही तालुक्यात दहा दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या होत्या, पण आजपर्यंत त्या प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई झालेली नाही, आरोपी सापडले नाहीत. हे सर्व पाहता पोलिसांच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.”
तसेच, रात्री दोन वाजता सायरन लावून फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या चोरांना सावध करण्यासाठी फिरतात की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेतकरी व ग्रामस्थ वर्गाने एकमुखाने मागणी केली आहे की, पोलीस विभागाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, आरोपींवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
👉 विशेष मुद्दे :
- मुल तालुक्यात गोहत्या बंदी कायदा असतानाही वाढत्या गोहत्या आणि मांस विक्रीच्या घटना
- पोलिसांकडे पुरावे असूनही कारवाईचा अभाव
- शेतकऱ्यांच्या तक्रारींना न्याय न मिळाल्याने वाढलेली नाराजी
- माजी उपसरपंच विजय जाधव यांचा पोलिस विभागावर तीव्र टीकेचा सूर
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार दाखल – तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी
हाच प्रश्न आज शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे – “मुल तालुक्यात गोहत्या बंदी कायदा लागू आहे की नाही?”
हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण शेतकरी वर्गाच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे. आता प्रशासनाने आणि पोलिसांनी या गंभीर विषयावर ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading